राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अनंतात विलीन झाले आहेत. राज्याचे लाडके दादा पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. आज (२९ जानेवारी) त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजित पवार यांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवारांच्या अनाकलनीय वृत्तामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजित पवारांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.















