जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत गोव्यात रस्ता अपघातात एकूण 108 जणांना मृत्यू आला असून यातील 80 टक्के मृत्यू हे दुचाकी अपघातांशी निगडित आहेत. यंदाच्या पाच महिन्यांत एकूण 87 मृत्यू दुचाकी अपघातामुळे झाले असून त्यातील 78 जण दुचाकी चालविणारे असून दुचाकीच्या मागे बसलेल्या 9 स्वारांचा समावेश आहे, अशी माहिती वाहतूक पाेलिस विभागाच्या दफ्तरातून मिळाली आहे.
मागच्या पाच महिन्यांत गोव्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी 104 अपघात जीवघेण्या स्वरूपाचे असून त्यात 108 जणांना मृत्यू आला आहे. दर महिन्याला 21 अपघाती मृत्यू अशी ही सरासरी असून बेदरकार वाहने हाकणे आणि वाहतूक नियमांचे पालन न करणे हीच या अपघाताची मुख्य कारणे असल्याचे दिसून आले आहे.
मागच्या पाच वर्षांत गोव्यात जे 104 जीवघेणे अपघात झाले आहेत, त्यातील किमान 15 अपघातांत रेंट अ बाईक आणि रेंट अ कार या वाहनांचा समावेश आहे. यातील बहुतेक चालक हे बिगरगोमंतकीय पर्यटक असून गोव्यातील रस्त्यांची पुरेशी माहिती नसल्यामुळेच हे अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गोव्यातील रेंट अ बाईक आणि रेंट अ कार हा व्यवसायच बंद करावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. जर हा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर या व्यावसायिकांनी पर्यटकांना वाहन देताना स्वत:चा चालक त्यांच्याबरोबर द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रेंट अ कार आणि रेंट अ बाईक यामुळे गाेव्यातील कित्येकांना रोजगार मिळतो. ही जरी गाेष्ट खरी असली तरी त्यामुळे निष्पाप लाेकांचे जीव जाऊ लागले आहेत, ही गोष्ट तेवढीच खरी आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नाही. मडगाव आणि शिवोली येथे हल्लीच अशा वाहनचालकांकडून दोन अपघात झाले आहेत ते अंगावर काटा आणण्यासारखे आहेत. त्यात एका युवकाचा बळी गेला तर एक महिला अजूनही मृत्यूशी झुंज देत इस्पितळात उपचार घेत आहे.
या व्यवसायावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, अशी एकंदर स्थिती आहे. रेंट अ कार आणि रेंट अ बाईक यामुळे गोव्यात नेमके किती जणांचे बळी गेले आहेत याची माहिती आम्ही माहिती हक्क कायद्याखाली मागितली आहे. ती माहिती मिळाल्यावर खरे चित्र स्पष्ट होईल. या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात सध्या आम्ही ‘रेंट अ कार नाका’ ही जागृती माेहीम हाती घेतली आहे, असे ‘मडगांवचो आवाज’चे नेते प्रभव नायक यांनी सांगितले.
















Leave a Reply