लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सौ. सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकास कामांचे कौतुक केले. बारामतीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी आणि त्यांच्या कल्पनेतून झाला असल्याचा विशेष उल्लेख सुनेत्रा पवार यांनी केला.

घड्याळाला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत याचाही आवर्जून उल्लेख सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात केला आहे.

गेल्या १० वर्षांपासून जीव झोकून पंतप्रधान मोदी काम करत आहेत. भारतात झालेला विकास ही नरेंद्र मोदींची किमया आहे. मात्र बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत हेही सुनेत्रा पवार यांनी आवर्जून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा चांगला विकास केला आहे. प्रत्येक क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगलयान, चांद्रयान यासारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

सौ. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार विजय शिवतारे आदींसह महायुतीचे नेते मोठया संख्येने उपस्थित होते.