लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ठाकरे गटाच्यावतीने वचननामा असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या जाहीरनाम्याची घोषणा केली. या जाहीरनाम्यात विविध मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या आश्वासनासह केंद्र सरकारकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

याबरोबरच महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्यासाठी प्राधान्य देणार, तसेच महाराष्ट्रातून बाहेर जात असलेले प्रकल्प आणि महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते आणि बियाणांवरील तसेच शेती उपकरणांवरील सर्व जीएसटी माफ करण्याचे आश्वासन ठाकरे गटाने जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननाम्याची घोषणा केली आहे. जाणून घेऊया जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या आहेत.

जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा केल्या?

शेतकऱ्यांना जो पीकविमा मिळतो, त्याचे निकष बदलून योग्य नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन.
खते आणि बियाणांवरील, शेती उपकरणांवरील सर्व जीएसटी माफ करण्याचे आश्वासन.
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य पावलं उचलणार.
शेतकऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी गोदामं बांधून देण्याचे आश्वासन.
पर्यावरणाचा धोका वाढवणाऱ्या प्रकल्पांना आम्ही राज्यात येऊ देणार नाही.
शेतकऱ्यांसाठी एक सर्व्हे सेंटर सुरु करणार, त्यामधून जगभरातील पिंकांबाबत व दरांबाबत मार्गदर्शन घेणार.
सरकारी विभागामध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्यासाठी प्रयत्न करणार.
मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
राज्यात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन.