लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए २९०-३०० जागांवर आघाडीवर असून बहुमताचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी २३० जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीची कामगिरी एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा चांगली झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील ५ मंत्री सध्याच्या आकडेवारीनुसार पिछाडीवर आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप), लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) आणि जनता दल (युनायटेड) यांचा समावेश असलेली एनडीए आघाडी बिहारमध्ये आघाडीवर आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) १४ जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहे.

बिहारच्या आरा लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आरके सिंह १८२१३ मतांनी पिछाडीवर आहेत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सुदामा प्रसाद आघाडीवर आहेत.बिहारच्या उजियारपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नित्यानंद राय २०११ मतांनी पिछाडीवर आहेत, तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार आलोक कुमार मेहत आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी ५०७५८ मतांनी पिछाडीवर आहेत, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार किशोरी लाल १६९८२७ मतांसह आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अजय कुमार ३१७५ मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा २११६३८ मतांसह आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील चंदौली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. महेंद्र नाथ पांडे ९८३० मतांनी पिछाडीवर आहेत, तर समाजवादी पक्षाचे उमेदवार बीरेंद्र सिंह ३११६६५ मतांलह आघाडीवर आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत एनडीएने ३५२ जागा जिंकल्या, त्यापैकी एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. विरोधी यूपीएला केवळ ९३ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी काँग्रेसला ५२ जागा जिंकल्या.