आपले बहुमूल्य मत देऊन मला विजयी करणाऱ्या ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा ऋणी असून हे मत आपण विकासाला दिलेले आहे, प्रगतीच्या नव्या वाटेला दिलेले आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत तत्पर राहिन, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी विजयानंतर ट्वीट करत दिला आहे.

आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे सोबत वाटचाल करायची आहे. हा सत्याचा विजय आहे, हा विकासाचा विजय आहे, हा आपल्या सर्वांचा विजय आहे ! अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले आहेत.

या उमेदवारीसाठी माझ्यावर विश्वास दाखवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्वच मित्रपक्षांचे नेते, हा विजय शक्य करण्यासाठी दिवसरात्र झटलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा तसेच महायुतीतील भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप व मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुनिल तटकरे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.