माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून बंदचे आवाहन केले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी 24 ऑगस्टचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाहीतर जे बंद करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूनिका जाहीर केली. महाराष्ट्र बंद मागे घेत आहे पण राज्यभर काळ्या फिती लावत आंदोलन करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मी दोन तास आंदोलन करणार आहे. तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझं रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असं लोकांना वाटतं, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते आपण पाहिलं. आपल्या देशात तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचं आंदोलन थांबणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असतं ते दाखवेल अशी आशा आहे. काल कोर्टाने जे थोबडवलं ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का. आताही मी कौतुक करत आहे. न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकतं. तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे. सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. ते स्वतच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांना जागरूक करत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहि‍णींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्टावर असेल. त्यांचे काही सदाआवडते लोक आहेत. ते नेहमी कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात. मागे मराठा आरक्षणाच्या विरोधातही ते गेले होते, असं म्हणत ठाकरे यांनी सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.