राजकोट येथील शिवपुतळा कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली. २६ ऑगस्टला राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला. तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. त्याला ४ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी तो पत्नी आणि आईला भेटायला आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथकं तयार केली होती. जयदीप आपटेच्या अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. दुपारी १ वाजून १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तर हळहळलेच. मात्र पुतळा पडल्याचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त अतिशय नाराज झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली. तर विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो फरार झाला होता. तेव्हापासून जयदीप आपटेला अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती.

जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करून दूध नाका परिसरात उतरला. यावेळी जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता. त्याच्या हातात दोन बॅग होत्या. टोपी आणि मास्क लावून जयदीप आपटे हा आपल्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात होता. मात्र, इमारतीच्या गेटवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणत्याही रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते. जयदीप आपटे हा इमारतीपाशी आल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे आयडी कार्ड मागितले. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा चेहरा पाहून हा जयदीप आपटेच असावा, असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्याच्या नावाने आवाज दिला आणि घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या जयदीप आपटे रडायला लागला. गयावया करु लागला त्यावेळीच पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

जयदीप आपटेला आम्ही अटक केली आहे. कल्याणमध्ये तो आला तेव्हा त्याला अटक केली. आता न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहे. तपास यंत्रणांना जयदीप आपटे सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. आम्ही गुप्तपणे कारवाई केली. जयदीप आपटे प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं, अनेकांनी राजकीय पोळ्या भाजण्याचं काम केलं त्यामुळे आम्ही गुप्तपणे ही कारवाई केली अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी माध्यमांना दिली. आज जयदीप आपटेला न्यायालयात नेण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.