दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर राजी जामीन मंजूर केला. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगामधून बाहेर आले. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. दरम्यान, आता तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा करत पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच यावेळी त्यांनी असंही म्हटलं आहे की, मी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या निवडणुकाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबर घेण्यात याव्यात, असंही ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

“काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे मी काही काम करु शकणार नाही. मागच्या काही वर्षभरात केंद्र सरकारने काय कमी अटी घातल्या होत्या का? केंद्र सरकारने एक कायदा, दोन कायदे फक्त कायदे आणून आमची पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर केला. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी (अरविंद केजरीवाल) आणि मनिष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीच्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.