मुंबईतील महानंद म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने सरकारवर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राज्यासह सरकारवर टीका करत हे सरकार गुजरात धार्जिणी असल्याचा ठपकाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. केंद्रासह राज्य सरकारवर टीका दुग्ध संपत्ती गुजरातच्या घशात घालण्याचा प्रयत्न येथील सरकारचा चालला असल्याची टीका करत प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा! अशी आर्त हाक आता रामाला मारण्यात आली आहे.

महानंद दूध संघाचा ताबा गुजरातमधील राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सामनातून टीका करत दुग्ध विकास मंत्र्यावर ठपकाही ठेवण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा दूध संघ फायद्यात असताना महानंद दूध तोट्यात कसे काय असा सवाल करून दूध संघाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न कोण सोडवणार असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

महारष्ट्रातील सहकारी दूध उत्पादक संघाची महानंद ही शिखर संस्था आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही शिखर संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचेही पगार झाले नाहीत. त्यामुळे कर्मचारीही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न न करता तो गुजरातला विकण्याचा घाट या सरकारने घातला आहे. तर राज्यातील दूध संस्थांच्या राजकारणात आता गुजराती मिठाचा खडा टाकण्याचेच काम राज्य सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

महानंद दूध संघ गुजरात देण्याचा निर्णय झाला आहे. तरीही हे सरकार गप्प आहे. दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी संघ आर्थिक अडचणीत सापडल्यापासून आंदोलने केली आहेत. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे तर महाविकास आघाडीच्या काळात महानंदला उभारी देण्याचे काम सरकारने केले होते. मात्र आता मिंधे-फडणवीस-अजित पवारांचे स्वाभिमानी सरकार गप्प का आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

महायुतीच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत सामनातून ताशेरे ओढण्यात आले आहे. यावेळी राजकीय घराणेशाहीवरही ठपका ठेवत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अनेक सवाल उपस्थित करून राज्यातील आणि विखे पाटलांचा दूध संघ फायद्यात असतान दूध क्षेत्रातील ही शिखर संस्था आर्थिक अडचणीत कशी सापडली असा सवाल उपस्थित करण्यात आला असून ही पुन्हा घराणेशाही असून विखे हे दुग्ध विकासचे मंत्री व मेहुणे महानंदचे चेअरमन आहे तरीही महानंद खड्ड्यात गेली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.