बिहारमधून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राजीनामा दिला आहे. नीतीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गेले आहे. यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होत आहे.

आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षही आणि एनडीएमधील इतर पक्ष असणार आहे. नीतीश कुमार आज नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत.नीतीश कुमार यांनी रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आता काही वेळात भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर आजच नीतीश कुमार नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

दरम्यान भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नीतीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. यासंबंधित पत्रावर आमदारांच्या सह्या घेतल्या जात आहेत. त्यानंतर भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नीतीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 2 उपमुख्यमंत्र्यांसह आज संध्याकाळीच शपथ घेणार आहेत. ते नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत शपथ घेणारे दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचे असू शकतात. तसेच भाजप-जेडीयूकडून प्रत्येकी 14 मंत्री शपथ घेऊ शकतात. जीतन राम मांझी यांच्या पक्षानेही 2 मंत्रीपदांची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.