kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी हाती बांधले घड्याळ;अजितदादा पवारांनी केले स्वागत…

स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला बेरजेचे राजकारण शिकवले आणि ते आपण करतोय. जातीभेद, धर्म, पंथ न बाळगता एकत्र नांदण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले गेले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

शरदचंद्र पवार गटाचे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

पक्षाच्या वाढीसाठी नवीन कार्यकर्त्यांची उभारणी करायची आहे. त्यासाठी वडीलधा-या लोकांचा आशिर्वाद घ्यायचा आहे. आणि त्यांच्या सहकार्यानेच पक्षाची बांधणी करायची आहे. हे सांगतानाच पक्षाची स्थापना अशाच ज्येष्ठ लोकांच्या आशिर्वादाने झाली आणि आज पक्ष २६ वर्षाचा झाल्याचे अजित पवार म्हणाले.

सत्तेच्या विरोधात जाऊन विकासकामे होत नसतात तर सत्तेत राहून जनतेची कामे होत असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यादृष्टीने कामाला लागा. भेदभाव न करता आपल्या पक्षाला कसे यश मिळेल याकडे लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे पक्षाला फटका बसू शकतो हे सुद्धा अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.

आपण चुकीचे वक्तव्य करतो आणि मग ते सर्व माध्यमातून दाखवले जाते. सोशल माध्यमांची सध्या ताकद वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी भान ठेवून वागले पाहिजे, बोलले पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

याशिवाय धाराशिव, अहिल्यानगर, अकोला या जिल्हयातील विविध पक्षातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार काशिनाथ दाते, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, धाराशीवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूज्जमा, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.