मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने दिग्दर्शित केलेला ‘मनाचे श्लोक’ हा मराठी चित्रपट आज शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट पुण्यातील धायरी भागातील अभिरूची मॉलमधील थिएटरमध्ये आणि कोथरूडमधील एका थिएटरमध्ये बंद पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उज्वला गौड या महिलेने हा शो बंद पाडला असल्याची प्राथमिक माहिती असून, ही महिला एका हिंदू संघटनेशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे.
या चित्रपटाच्या नावावरून आधीच वादंग निर्माण झालं होतं. यापूर्वीच या चित्रपटाला पुण्यातून विरोध करण्यात येत आहेत. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्यामुळे या चित्रपटावरून वादंग निर्माण झाले होते.
हिंदू जनजागृती समितीने या चित्रपटाला तीव्र विरोध दर्शवला होता आणि हा हिंदूंच्या श्रद्धेचा “बाजार मांडण्यासारखा प्रकार” असल्याचा आरोप करण्यात आला होता. याशिवाय , समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती.
“चित्रपट दिग्दर्शकांना कसली आली लिबर्टी? लिबर्टीच्या नावाखाली काहीही करायचं का? ‘मनाचे श्लोक’ हा शब्द वापरायलाच कशी परवानगी दिली? जर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर आम्ही तो हाणून पाडू, आम्हाला तुरुंगात जायची भीती नाही,” असा इशारा मिलिंद एकबोटे यांनी दिला होता.
तर हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते पराग गोखले यांनी सांगितले होते की, “समर्थ रामदास स्वामी महाराजांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे पवित्र धार्मिक साहित्य आहे. या नावाचा वापर चित्रपटासाठी करणे हे केवळ श्रद्धेचा अपमानच नाही, तर धार्मिक भावनांना ठेस पोहोचवणारे आहे.” तसेच त्यांनी पुढे म्हटले होते की, “मनाचे श्लोक हे शीर्षक चित्रपटातून त्वरित मागे घ्यावे आणि केंद्र तसेच राज्य शासनाने भविष्यात अशा धार्मिक प्रतीकांच्या अविचारी वापरावर बंदी घालण्यासाठी कायदा करावा.”












