राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल ही सगळी भूमिका पार पाडली असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभप्रसंगी केला. ज्या जिजाऊंनी जन्माला घातले त्यांनी त्यांना वाढवलं…त्यांच्यावर संस्कार केले…. चांगले सल्ले दिले… त्यांना घडवण्याचे काम जिजाऊंनी केले ही बाब ध्यानात घ्या…असेही अजित पवार म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान… अस्मिता… लढावू बाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज आपले अभिमान आणि स्वाभिमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करुन स्वतःचे आरमार… जलदूर्ग उभारले त्यांच्या कार्यप्रेरणेतूनच गेली चार दशके महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या पराक्रमाची पताका सर्वदूर फडकत असताना आपण पहात आहोत असेही अजित पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुर्गम डोंगरदऱ्या कडेकपारीमध्ये अठरापगड जातीला… मावळ्यांना… बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांच्यात स्वराज्य निर्मितीची चेतना जागवून ख-या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. आपल्याला महाराजांच्या विचारांवर वाटचाल करायची आहे असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी केले.

सर्वांचा आदर करायला शिकवणारा राजा अशी महाराजांची ओळख आहे. अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले… स्वाभिमानाने जगायला शिकवले… काळ्या आईची सेवा करायला शिकवले… प्रत्येक माताभगिनींचा मानसन्मान शिकवला… अडचणीत असलेल्यांना मदत करायला शिकवले… आपल्या देशावर… राज्यावर आपल्या मातीवर प्रेम करायला शिकवले… याची काळजी घ्यायला शिकवले… आपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसर्‍या धर्माचा आदर सन्मान करायची शिकवण दिली… पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत जगलेल्या अंधारात चाचपडणार्‍या समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवले… लढायला आणि आत्मविश्वासाने उभं करायला शिकवले असेही अजित पवार यांनी सांगितले.

आपल्याला महाराजांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवायचा आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्याकाळात साडेतीनशे वर्षापूर्वी देणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. जागतिक दर्जाचे एक मॅनेजमेंट गुरू असू शकतात याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा पैलू आपल्याला पहायला मिळतात. रयतेची काळजी घेणारा एक महान राजा म्हणून ओळख आहे. शिवाजी महाराज भोगवादी राजा नव्हे तर खरे रयतेचे राजे होते शेतकऱ्यांचे कैवारी… कलावंताचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात कृतीत आणली असेही अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले. महाराज्यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करुया आपल्या महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्यासाठी एकजूटीने… एकदिलाने काम करुया असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

आपला राजा बहुजनांचा मावळयांचा शेतकऱ्यांचा होता… शेतकऱ्यांचे हित सांभाळणारा राजा आपले भाग्य आहे की हा राजा आपल्या मातीत जन्मला आला असे उद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काढले. रयतेचा राजा कसा होता हे सांगता आले पाहिजे. हा राजा स्वार्थासाठी कधी लढला नाही तर अन्यायाविरुध्द लढला. आपल्या राजाने महाल नाही तर गडकिल्ले उभे केले ही खरी आपली संपत्ती आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. या स्वराज्य यात्रेत सर्वधर्मियांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष विचार घेऊन पुढे जायचे आहे. शिवभक्त या सप्ताहात सहभागी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ आज गेटवे ऑफ इंडिया येथे झाला. गेटवे ऑफ इंडिया येथे आगमन होताच राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन केले. शिवज्योत आणि पताका देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा, शिवगीते सादर करण्यात आली. मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी यावेळी स्वराज्य सप्ताहाची माहिती दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, युवा नेते पार्थ पवार, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आमदार अमोल मिटकरी, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते