बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका बसला आहे. निवडणुकांपूर्वी तीन वर्षांचा कष्टसाध्य प्रवास, हजारो किलोमीटरची पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता आणि ‘बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा या सर्व गोंगाटानंतरही निकालाने प्रशांत किशोर यांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता नितीशकुमार यांना 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्यास राजकारण सोडतो, असे आव्हान दिलेल्या प्रशांत किशोर आता काय करणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. अर्थात निकालामध्ये त्यांच्या पक्षाची निराशा झाली असली, तरी त्यांच्या पक्षाने केलेलं नुकसान एनडीएच्या पथ्यावर पडलेलं दिसून येत आहे. महाआघाडीला मोठा झटका या निवडणुकीच्या निमित्ताने बसला आहे.
प्रशांत किशोर यांचा प्रवास साध्या गावातून संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत गेला. कोनार गावात जन्मलेले PK बक्सरमध्ये शिक्षण घेऊन अचानकच UN च्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात झेपावले. 2011 पर्यंतचे त्यांचे आरोग्य क्षेत्रातील नियोजन, सर्वेक्षण, सामुदायिक सहभागाचे कौशल् याचाच परिणाम नंतर त्यांच्या राजकीय रणनीतीत दिसून आला. म्हणजेच, 2012 च्या गुजरात निवडणुकीत भाजपला दिलेला पाठिंबा ही सुरुवात होती.
2013 मध्ये ‘CAG’ या संस्थेची स्थापना करून 2014 च्या मोदी मोहिमेची रणनीती आखली. ती इतकी अचूक, इतकी धक्कादायक की भारतीय निवडणूक प्रचाराचा चेहराच बदलून गेला. ‘चाय पे चर्चा’, 3D रॅली, रन फॉर युनिटी, मंथन, डेटा-आधारित मायक्रो-टार्गेटिंग हे सर्व प्रयोग त्यांच्या नावावर गेले. त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, स्टालिन, जगन रेड्डी, अमरिंदर सिंग, केजरीवालय. अर्थात देशातील जवळपास सर्व महत्त्वाच्या नेत्यांसाठी ते विजयी रणनीतीचे शिल्पकार ठरले. पण हे सर्व “इतरांच्या” संघटनांवर आधारित होते हे स्वतः PK यांनी मान्य केले होते. त्यांचा यशाचा पाया म्हणजे त्यांच्या क्लायंटकडे आधीपासून असलेली संघटनात्मक ताकद, स्थानिक रूट्स आणि सामाजिक समीकरणे. मात्र स्वतः राजकारणात उडी घेताना हेच समीकरण त्यांच्याविरुद्ध उभे राहिले.
2024 मध्ये जन सुराजची घोषणा त्यांनी मोठ्या दिमाखात केली. “बदल हवा” अशी आकांक्षा घेऊन त्यांनी बिहारच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचल्याचा दावा केला. त्यांनी 3 हजार किलोमीटरची पदयात्रा केली, आणि “हड्डी जळाली” म्हणत स्वतःच्या श्रमांचा उल्लेखही केला. 30 कोटी व्ह्यूजचा डिजिटल गाजावाजा, 50 ते 70 लाख स्थलांतरित बिहारात राहिल्याचा अंदाज आणि त्यापैकी “किमान दोन-तृतीयांश आमच्याकडे येतील” हा दावा या सर्वांमुळे PK स्वतःच आपल्या अपेक्षांच्या जाळ्यात अडकले.
240 जागांवर उमेदवार उभे करून त्यांनी बिहारच्या राजकीय नकाशावर एक भव्य आकृती काढण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवाचा अभाव, स्थानिक पातळीवर संघटनात्मक मुळांची कमकुवतता, आणि जातीच्या समीकरणांवर भक्कम पकड नसणेया सर्वांनी एकत्र येऊन जन सुराजचा वेग निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ‘मंद’ केला. पाटण्यातील राजकीय वर्तुळाने हा अंदाज आधीच व्यक्त केला होता आणि निकालांनी त्याचीच पुष्टी केली. प्रशांत किशोर यांना यावेळी जिंकता आले नाही. इतकेच नाही, ते स्पर्धेतसुद्धा नाहीत हे स्पष्ट आहे. रणनीतीचा बादशाह असलेला PK, स्वतःच्या मैदानात मात्र शून्यावर मोजला गेला. हा पराभव नव्हे, तर ‘भूगोल बदलण्याचा आत्मविश्वास’ विरुद्ध ‘भूगोलाने दाखवलेली वास्तवता’ अशी झाली आहे. त्यांनी आयुष्यभर ज्यांच्यासाठी विजयाचा रोडमॅप तयार केला, त्याच नकाशावर स्वतःला स्थान शोधताना त्यांना पहिल्याच वेळी पूर्णपणे गडगडावे लागले.














