kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, 20 आमदार सोडून जातील’, चंद्रकांत खैरे यांचा धक्कादायक दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात नाराजीनाट्याच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांमध्ये एकमेकांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश करुन घेण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे मंत्री व्यथित झाले आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. तर इतर मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून पक्षप्रवेशाच्या घटनांवर नाराजी व्यक्त केली. कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिल्याचं सांगत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली. पण या फोडाफोडीच्या राजकारणात तुम्हीच सुरुवात केल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं.

“महायुतीमधील या फोडाफोडीला तुम्ही उल्हासनगरममध्ये सुरुवात केली. तुम्ही करणार तर चालवून घ्यायचे आणि भाजपने केलं तर चालणार नाही, असं होणार नाही”, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादा भुसे, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक यांचा समावेश होता अशी माहिती आहे. या घडामोडींनंतर आता विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक आणि मोठा दावा केला आहे.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपात जातील, अशा बातम्यांमुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 20 आमदार सोडून जातील”, असं धक्कादायक वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं. चंद्रकांत खैरे यांनी ‘एबीपी माझा’सोबत बोलताना संबंधित खळबळजनक दावा केला आहे.

चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?

“हे तर आता सुरु झालेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांचे आपापसांत मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरु झाले आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व कामे थांबवले आहेत. अनेक जण आमदार वगैरे तिथे जातात. कार्यकर्ते जातात. देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही थारा देत नाहीत, अशी काल मला मुंबईमध्ये एका खूप मोठ्या माणसाने सांगितलं. कुणीही गेलं तरी देवेंद्र फडणवीस त्यांचे काम करत नाही”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांना भरभरून द्यायचे. त्यावेळेस त्यांनी भाजपला दिलं नाही. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस देऊ लागले. मला एकच सांगायचं आहे, आता प्रत्यक्षात सगळीकडून बातम्या यायला लागले आहेत. ते इकडून चालले, ते तिकडून चालले. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत. पण शिंदे नाराज जरी असले तरी नियतीचा खेळ कसा असतो बघा, तुम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. 40 लोकं घेऊन गेले. आता परिस्थिती अशी झाली आहे, नियतीचा खेळ असा आहे, तुम्ही त्यांना सोडलं, आता हे तुम्हाला सोडत आहेत. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चांगलं करत आहेत. त्यांना कळू दे की त्यांची काय चूक होती”, असा टोला खैरैंनी लगावला.

“शिंदेंचे 20 आमदार मागेच सोडण्यासाठी तयार झाले होते. मला वाटतं भाजपमध्ये जाण्यासाठी शिवसेना सोडतील अशा बातम्या आहेत. आता जास्त झाले आहेत. काही लोकं सोडून जातील. शिंदे प्रचंड नाराज आहेत. मला काल लोकं भेटले. तेव्हा समजलं. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाला सोडलं. तुमच्यासोबत असंच होईल. ही नाराजी अशीच राहील. पुढे जावून आणखी नाराजी वाढेल. महिना-दोन महिन्यात तर खूप चित्र वेगळं झालेलं दिसेल. राजकारणात काहीही उलथापालथ होऊ शकते. भाजप ह्यांना सरळ करेल. ही सुरुवात झालेली आहे”, असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.