kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण.. ; पुण्याच्या सभेत प्रवीण तरडे कडाडले

पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या सभेत प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडेदेखील उपस्थित होते. या सभेतील भाषणात “मी माझ्या मित्रासाठी इथे आलोय, कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहे”, असं विधान प्रवीण तरडेंनी केलं.

नेमकं काय म्हणाले प्रवीण तरडे ?

“संस्कृतीचं वरदान आहे त्या माणसासमोर आज बोलावं लागतंय. काही नाही, मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी एवढंच सांगेन, दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे. सालस, सज्जन आणि सुशिक्षित नेतृत्व आपल्याला मिळतंय. माझ्या चित्रपटातील एक डायलॉग घेऊन मी बोलेन, ‘दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला स्वराज्यात, तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जमात आहे आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट’ हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे. काही उदारणं दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्यात घडली त्यावर मान्यवर बोलतीलच, तेवढ्यासाठी हे उदाहरण दिलं”, असं प्रवीण तरडे म्हणाले.

“आज साहेब आले आहेत, म्हणून मी एक गोष्ट बोलतो. माझा धर्मवीर चित्रपट आला त्यावेळी त्याच्यातला राज ठाकरेंचा सिनेमातला एक सीन कट झाला, अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले. राज ठाकरे यांना त्याचं कारण माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनीदेखील अनेक भाषणात ते सांगितलेलं आहे. राज ठाकरे हे आमचे आदर्श आहेत,” असं प्रवीण तरडे म्हणाले.

“कलाकाराच्या पाठिशी एखाद्या पक्षाने किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातील प्रत्येक कलाकाराने अनुभवलेलं आहे, त्यामुळे मुरलीधर मोहोळचा मित्र, मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भाजपाने पुणे शहराला दिलं आहे. त्याला आपल्याला भाजपाचे दिवंगत नेते गिरीश बापट ज्या लीडने जिंकून आले होते त्याच्यापुढे जाऊन जास्त मतदान करा. आपल्या मुरली अण्णाला मोठ्या डौलात दिल्लीत पाठवा. मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट मुळशीतून मानगाव मार्गे रायगडला नेली, त्यांच्या पत्रात उल्लेख आहे की अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणसं या भागात राहतात. त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचली, तो मुळशीतला मावळा आज मोदींनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे मुळशीचा हा प्रामाणिकपणा सर्वदूर न्यायचा आहे, अशी हात जोडून विनंती,” असं प्रवीण तरडे म्हणाले.