सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. आज मंगळावरी (29 जुलै) सलग दुसऱ्या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत भाषण केलं. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं झाली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सरकारला जाब विचारला आहे.
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा लोकसभेत घाणाघाती भाषण झालं. यावेळी त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. प्रियंका यांनी आपल्या भाषणात विचारलं की, ‘पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, तो का झाला? या प्रश्नाचं उत्तर अद्यापही का देण्यात आलं नाही?’
आपल्या भाषणात प्रियांका म्हणाल्या की, ‘काल संरक्षणमंत्र्यांनी एक तास भाषण दिलं ज्यामध्ये त्यांनी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासबद्दल भाष्य केलं. पण या भाषणात एक गोष्ट राहिली, ती म्हणजे हा हल्ला कसा झाला?’
आपल्या भाषणात प्रियांका म्हणाल्या की, ‘काल संरक्षणमंत्र्यांनी एक तास भाषण दिलं ज्यामध्ये त्यांनी दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासबद्दल भाष्य केलं. पण या भाषणात एक गोष्ट राहिली, ती म्हणजे हा हल्ला कसा झाला?’
सरकारवर टीका करताना प्रियांका म्हणाल्या की, “तुम्ही इतिहासाची चर्चा करत राहा, आम्ही वर्तमानाची चर्चा करू.” प्रियंका यांनी विचारलं की, “जबाबदारी निश्चित का झाली नाही? गृहमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही? सरकारमधील मंत्र्यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. त्या हल्ल्याच्या वेळी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला. जबाबदारी निश्चित झाली होती. पण पुलवामा झाला, मणिपूर जळून खाक झालं, पहलगाममध्ये घटना घडली, तरी जबाबदारी कुणी घेतली?” प्रियांका पुढे म्हणाल्या की, “हे सरकार नेहमी प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करतं. यांच्यात देशाच्या नागरिकांप्रती कोणतीही जबाबदारीची भावना नाही. यांच्यासाठी सगळं काही केवळ राजकारण आणि प्रचार आहे.”
“बैसरन घाटी, पहलगाम इथं एकही सुरक्षाकर्मी का नव्हता? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांची नाही का?” असा सवालही प्रियांका यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे सांगितलं, “जेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुरुवात झाली होती, तेव्हा संपूर्ण देश एकजुट झाला होता. पंतप्रधानांनी त्याचं श्रेय घेतलं, पण केवळ श्रेय घेऊन जबाबदारी पूर्ण होत नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की युद्ध सुरू असताना थांबवण्यात आलं. आणि ही घोषणा भारतीय लष्करानं किंवा भारत सरकारनं केली नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.”
तसेच, “इंदिरा गांधींनी पाकिस्तानचं विभाजन करून दाखवलं होतं,” असं देखील प्रियांका यांनी सरकारला सुनावलं.
गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले?
तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात सांगितलं होतं की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं 26 निष्पाप नागरिकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मारले गेले आहेत. लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील विशेष चर्चेत भाग घेत असताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “ऑपरेशन महादेव’ची संपूर्ण माहिती मी या सभागृहातून देशाला देऊ इच्छितो. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुलेमान, अफगाण आणि जिब्रान या नावाचे तीन दहशतवादी ठार करण्यात आलं.”














