दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दादर येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. आज नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या सभेची उत्सुकता सर्वांनाच आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात यंदाच्या अनेक घडामोडी पाहता मनसेच्या पाडव्याच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.

राज्यभरातून लाखो मनसैनिक मनसेच्या या गुढीपाडवा मेळाव्याला येणार असल्याचं समोर येत आहे. यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात हजारो खुर्च्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. भल्या मोठ्या स्टेज शेजारी एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शिवाजी पार्कवर खाण्यापिण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्यात सुरक्षेसाठी ३०० पोलीस जवान आणि ३५ पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दी नियोजनासाठी एक विशेष पथक असेल. शिवाजी पार्क मैदान परिसरात मंगळवारी नो पार्किंग झोन असेल. तसेच येथील वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मनसेचे १०० सुरक्षारक्षक, ५०० स्वयंसेवक व १०० वोर्डन, याठिकाणी तैनात असतील.

नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली होती. या मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या युती संदर्भात संकेत दिले आहेत.त्यामुळे राज ठाकरे याबाबत काही बोलणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून सध्याच्या राजकारणावर भाष्य केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते काय बोलतात, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मनसे कार्यकर्ते मेहनत घेतली आहे. मनसे नेत्यांना देखील आपल्या प्रमुख नेत्याच्या भूमिकेची आणि भाषणाच्या आतुरता आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या मेळाव्यापूर्वी गेल्या काही महिन्यांपासून मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या घडामोडी, सध्याचं सुरू असलेले राजकारण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका गेल्या काही महिन्यांपासून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेची भूमिका काय आहे हे मांडणार आहेत त्यामुळे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

२००६ साली पक्ष स्थापनेनंतर २०१५ पासून मनसेचे भव्य दिव्य गुढीपाडवा मेळावे शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये पार पडले होते . त्यानंतर गेल्यास अठरा वर्षात झालेल्या सभा यापेक्षा अधिक मोठी सभा यासाठी या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे नेहमीच्या शैलीत घणाघाती भाषण करण्याची शक्यता आहे. मनसे महायुतीत सहभागी होणार का ? युती संदर्भात आतापर्यंत काय घडलं आणि पुढे काय होणार? मनसे हाती घेणार नवीन मुद्दे, कशी असणार वाटचाल? राजकारणात मनसे कोणती नवी दिशा घेणार ?, या प्रश्नांची उत्तरे उद्या मिळू शकतील.