शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुरमीही उतरवू. सगळं सहन करून मी उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहिल, असेही आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले. याचा संदर्भ देत असताना ते म्हणाले, “मला आणि आदित्य ठाकरेला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते, हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे.”

लोकसभा निवडणुकीत असा नडलो की, पंतप्रधान मोदींनाही घाम फोडला. माझी अपेक्षा होती की, मुंबईच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहीजे होत्या. म्हणजे त्यांच्या अंगावर कपड्याचे जे काही चार-दोन तुकडे उरले होते, तेही उतरविले असते.