एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याच्या केलेल्या विधानावरून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी हेच स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेब, टिपू आणि असंख्य इस्लामी मुघल राजांना याच महाराष्ट्राच्या भूमीत गाडलेले आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्यांनी या हिंदू राष्ट्राला आणि महाराष्ट्राला हिरवे करण्याची स्वप्न पाहिली. त्यांना कबरीत जावे लागले आहे. इम्तियाज जलील कदाचित त्यांचा स्वत:चा इतिहास विसरले आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीकडे जाऊन उभे राहावे आणि मग हे स्वप्न पाहावे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपूची स्वप्न पाहणाऱ्यांच्या कबरी औरंगजेबाच्या बाजूला दफन करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातला हिंदू समाजच हाती घेईल.
जलीलांच्या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, इम्तियाज जलील यांनी स्वत:ची औकात आणि परिस्थिती विसरली आहे.छत्रपतींच्या भक्तांचे रक्त आजही आपल्या शरीरात वाहते. तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्या महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र अशा धमक्यांची भीक घालत नाही. जलील ज्या शहरात राहतात त्या शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर आहे. जर महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरणे थांबवले नाही तर, जलीलांचे महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल. आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले म्हणून आम्ही गप्प बसू असे नाही. गरज पडल्यास १५ सेकंदही पुरेसे आहेत.
प्रकरण नक्की काय?
मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांनी माफी मागितल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर, एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंब्र्यात जात सहर शेखच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत सांगितले की, केवळ मुंब्राच नव्हे तर येणाऱ्या काळात आम्ही संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू.














