धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात निविष्ठा वाटपातील कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (National Food Security Mission) अंतर्गत राबवण्यात आलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर तब्बल 15 कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ माजली असून सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे. या प्रकरणी कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, राज्यभरातील कृषी यंत्रणेला स्पष्ट इशारा मिळाल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (2025-2026) धाराशिव जिल्ह्यात 24 कोटींच्या निविष्ठा वाटण्यात आल्या. यात मयत शेतकरी तसेच बनावट नावे टाकून निविष्ठा वाटप दाखवून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यानंतर हे प्रकरण तापलं. अखेर आता कृषी अधिकाऱ्यांना कारवाईचा दणका बसला आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करून संबंधित अनियमिततेची सखोल तपासणी केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे.













Leave a Reply