“बारामती हा पवारांचा गड आहे, तिकडं काय निकाल लागेल हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये काही विषय हे सामोपचारानं घ्यायचे असतात. आज सुनेत्रा पवार फक्त निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. निवडणुकीला अजून वेळ आहे, तोपर्यंत नक्कीच शिवसेनेची भूमिका काय आहे हे तुम्हाला कळेल,” असा गर्भित इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
“निवडणुका बिनविरोध होऊ नयेत ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यानुसार त्यांनी फॉर्म भरला आहे. आज निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका भाजपा घेत आहे. मात्र नांदेडच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपानं आपला उमेदवार उतरवला होता आणि खुद्द अमित शाह हे देखील प्रचारासाठी आले होते. याचबरोबर सोलापूरमध्येही अशाच प्रकारचा उमेदवार भाजपानं उतरवला होता. यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवत आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय संवेदनशीलता संपवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मोदी शाहा हे देशांमध्ये सत्तेवर येण्यापूर्वी राजकारणामध्ये संवेदना होती. मात्र या सर्वांनी ही संवेदना मारून टाकली, असा दावा संजय राऊत यांनी केला.
“अजित पवार व एकनाथ शिंदे दोघंही महाविकास आघाडीसोबत असताना त्यांच्यासोबतचे संबंध अतिशय चांगले होते. मात्र दोघांनीही भाजपासोबत जाऊन जी भूमिका घेतली ती महाराष्ट्र हिताची नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची भूमिका आता दोघांनीही घेतलेली नाही. यामुळे आम्ही कितीही संवेदनशील असलो, तरीही राजकीय दृष्ट्या निर्णय घेताना आम्हाला विचार करून घ्यावा लागतो. चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. नातीगोती काही वेळोवेळी दूर ठेवावी लागतात. आजही आम्ही महाविकास आघाडी सोबत ठामपणे उभे आहोत. जर नसतो तर आजवरच्या सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढलो नसतो,” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
















Leave a Reply