बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. बंदीच्या या निर्णयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शविला होता. 1982 सालापासून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशांनुसार शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी याच ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केले, ते आजतागायत सुरू आहे. दुर्गाडी किल्ल्याचा वाद गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. यापूर्वीही अनेकदा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत तात्पुरती व्यवस्था पोलिसांकडून केली जाते. परिसरात कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या ठिकाणी राज्य राखीव पोलिसांकडून अहोरात्र जागता पहारा असतो. सणासुदीच्या काळात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो.
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आला आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर, तर पायथ्याशी ईदगाह ही हिंदू, मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात वाद सुरू आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की येथे मूळ दुर्गा देवीचे मंदिर आहे. तर मुस्लीम समाजबांधव ईदगाह असल्याचा दावा करत आहे. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र शिवसेना गेल्या 50 वर्षांपासून याच कारणास्तव आंदोलन करते. गेले काही वर्ष दोन्ही शिवसेना इथे आंदोलन करताना दिसून येत आहेत तर यावर्षी भाजप देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे.










Leave a Reply