आज ठाण्यामध्ये महायुती विजय संकल्प मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी कोकणच्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. सर्वांचं अभिनंदन… कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळालं. काही लोक म्हणाले आम्ही तुम्हाला तडीपार करू कोकणच्या जनतेने त्यांना तडीपार केलं… आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक आली आहे. तेव्हा पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस म्हणाले, सर्वात आधी राज ठाकरे यांचे आभार मानतो. अभिजीत पानसे हे उमेदवार होते. पण आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली. निरंजन डावखरे आमचे आमदार आहेत. आपण महायुती म्हणून काम करत आहोत. त्यामुळे तुम्ही उमेदवाराला थांबायला सांगावं. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसे यांनी सर्व मेहेनत निरंजन यांच्या पाठीशी उभी केली.

भिवंडीची जागा येऊ शकली नाही. तिकडे काय घडले ते माहीत आहे. जे मुंब्र्यात घडले तेच भिवंडीत घडले, असो ते आपण सुधारू. आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निश्चितपणे चांगला उमेदवार महायुतीने दिला आहे. इतर निवडणुकीपेक्षा नियोजनाची आणि वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सभा- रॅली घ्यायच्या नाही. मॅन टू मॅन पोहचयाचं आहे. सव्वालाख नोंदणी झाली आहे. ठाणे जिल्ह्यावर जास्त जबाबदारी आहे. पालघरवर आणि इतर जिल्ह्यांवर जबाबदारी आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निरंजन चेहेरा जेवढा पुढे नेणार तेवढा फायदा होणार आहे. जुनी पेंशन योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढला आहे. विधान सभेत मांडला जाणार आहे. मोठा निर्णय आपण घेतला आहे. संघटनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 2005 पूर्वी शिक्षक होते. त्यांच्याबाबत सकारात्मक कारवाई करत प्रश्न सोडवले जात आहेत. आपल्या काळात अनेक प्रश्न सोडत आहे आणि ते आपल्या मागे उभे आहेत, असंही फडणवीस म्हणाले.