राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर टिकले पाहिजे. दोन वेळा आरक्षण दिले गेले मात्र ते दोन्ही न्यायालयांनी रद्दबातल केले अशावेळी कायद्याच्या कसोटीवर आरक्षण देत असताना आणि शेवटचे आरक्षण रद्द करत असताना सर्वोच्च न्यायालयाने जी टिप्पणी केली आहे, ज्या उणीवा दाखवल्या आहेत. त्याची पूर्तता करुनच ते आरक्षण देणार असा राज्यसरकारने निर्धार केला असल्यामुळे त्याला कालावधी लागू शकतो त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देईल आणि तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता देईल असा विश्वास आणि खात्री खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षाची वाढती ताकद लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जिल्हयातून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश गेल्या दोन दिवसात झाले आहेत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.परभणी, लातूर, सोलापूर, नवीमुंबई येथील अनेक विविध पक्षातील पदाधिकारी व तरुणांनी गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.कर्जत येथे झालेल्या चिंतन शिबीरात प्रत्येक जिल्हाध्यक्षांना पक्षवाढीचे काम करण्यासाठी वाहन देण्याची चर्चा झाली होती. त्यानंतर दिनांक २२ डिसेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या राज्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी गाड्या देण्याची घोषणा केली होती त्यामुळे त्याची लवकरच अंमलबजावणी होईल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

बोलघेवड्या आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या कुणाही व्यक्तीच्या वक्तव्यावर मी बोलू इच्छित नाही. मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचे नाही असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.