गेले अनेक दिवस राज्यातून उद्योग बाहेर जात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?असा सवालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. नेमके काय म्हणाले आहेत ॲड. अमोल मातेले जाणून घेऊया.

काय म्हणाले आहेत ॲड. अमोल मातेले ?

राज्यातील उद्योग राज्याबाहेर जात असताना आता दुग्ध सहकाराची जननी असलेल्या महाराष्ट्रातून महानंद सारखी सहकारी संस्थाही गुजरातला चालवायला देऊन महाराष्ट्र भविष्यात डसणाऱ्या सापाला दूध पाजतोय.

राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी, महानंद हा ब्रॅण्ड राज्य सरकारनेच विकसित करायला काय हरकत आहे. तसे न करता महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे देऊन दिल्लीश्वरांना पायघड्या घालत आहेत. ‘उद्योग पळवू’ मालिका काही थांबायचा नाव घेत नाही..कटकारस्थानी सरकारच्या या महाराष्ट्रविरोधी कृतीला आमचा तीव्र विरोध आहे.