kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, पण नेमकं कारण …….

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे पद सोडले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, ‘प्रकृतीला प्राधान्य देण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.’

जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘मी राष्ट्रपतींचे आभार मानतो, माझ्या कार्यकाळात त्यांनी मला दिलेला पाठिंबा आणि त्यांनी केलेले सहकार्य अभूतपूर्व होते. मी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांनी दिलेला पाठिंबा अमूल्य होता, माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो आहे.’

जगदीप धनखड यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले की, संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे. जगदीप धनखड यांनी पुढे म्हटले आहे की, या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

जगदीप धनखड हे भाजपमध्ये येण्यापूर्वी जनता दल आणि काँग्रेसचे सदस्य होते. 1989 ते 1991 पर्यंत लोकसभेत जनता दलाचे खासदार होते. ते राजस्थानच्या झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 1991 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र 1991 साली त्यांचा अजमेर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर ते राजस्थानच्या किशनगड विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. 1998 मध्ये त्यांनी झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र यातही त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी धनखड हे 2019 ते 2022 पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.