पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (8 डिसेंबर) लोकसभेत चर्चा सुरू केली. 9 डिसेंबरपासून राज्यसभेतही या विषयावर चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, “जेव्हा वंदे मातरमला 50 वर्षे झाली होती, तेव्हा देशाला गुलामगिरीत जगणं भाग पडलं होतं. जेव्हा त्याला 100 वर्षे झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या साखळदंडात अडकला होता. तेव्हा भारताच्या संविधानाचा गळा दाबण्यात आला होता. 150 वर्षांनिमित्त त्या महान अध्यायाला, त्या वैभवात परत आणण्याची संधी आहे.”
ते पुढे म्हणाले, “1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटीश साम्राज्य अशांत असताना हे गीत लिहिलं होतं. भारतावर खूप दबाव होता. अनेक प्रकारचे अत्याचार होत होते, भारतीय लोकांची इंग्रजांकडून अडवणूक सुरू होती.”
‘वंदे मातरम’ या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी काँग्रेसवर गाण्यातील काही महत्त्वाचे भाग काढून टाकल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसनं हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं.
7 नोव्हेंबरला ‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता, “1937 मध्ये वंदे मातरममधील काही महत्त्वाच्या भागांना काढून टाकण्यात आलं होतं. त्याचा आत्मा असलेला एक भाग काढून टाकला गेला होता. वंदे मातरम तोडण्यात आलं. हा अन्याय का करण्यात आला? यातूनच विभाजनाची बीजे पेरली गेली.”
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेतील भाषणात नेहरूंचाही उल्लेख केला. ते म्हणाले , “वंदे मातरमला मुस्लीम लीगचा विरोध वाढत चालला होता. 15 ऑक्टोबर 1937 रोजी लखनौमधून मोहम्मद अली जिना यांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंना वाटलं की, त्यांचं स्थान धोक्यात आलं आहे. मुस्लीम लीगच्या निराधार दाव्यांना जोरदार प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली.”
“20 ऑक्टोबरला जिनांनी केलेल्या विरोधानंतर 5 दिवसांनी नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात नेहरूंनी जिनांच्या भावनांशी सहमती दर्शवली आणि म्हटलं की, वंदे मातरमची आनंद मठाची पार्श्वभूमी मुस्लिमांना भडकावू शकते. मी नेहरूंचं विधान वाचलंय. नेहरू म्हणाले की, मी वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी वाचली आहे. त्यानंतर नेहरूंनी लिहिलं की, मला वाटतं की या पार्श्वभूमीमुळे मुस्लीम भडकतील.”














