पुण्याचे माजी खासदार आणि क्रीडा विश्वातील मोठे नाव असलेले सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत.
भारतीय हवाई दलात ‘पायलट’ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कलमाडींनी पुढे राजकारणात मोठे स्थान मिळवले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणले.
असा होता प्रवास …
राजकारणाचा विचार करता सुरेश कलमाडी हे शरद पवारांचे नीकटवर्तीय असल्याचं मानलं जात होतं. विश्लेषकांनी तर पवार हे कलमाडींचे ‘गॉडफादर’ असल्याचंही म्हटलं होतं. शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं यासाठी कलमाडींनी प्रचंड प्रयत्न केले होते, असं पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेते सांगतात.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीधर झालेले सुरेश कलमाडी यांनी खडकवासलामधील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून पदवी घेतली होती.
भारतीय हवाई दलात ते १९६५ मध्ये पायलट म्हणून सहभागी झाले होते.
१९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
सुरेश कलमाडी यांनी एनडीएमध्ये हवाई दल प्रशिक्षण पथकाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले. नंतर ते हवाई दलातून निवृत्त झाले.
त्यानंतर मात्र कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश केला.
१९७० च्या दशकात कलमाडी यांची पुणे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
सुरेश कलमाडी १९७७ मध्ये पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि नंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन काँग्रेस एस हा नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा कलमाडी त्यांच्याबरोबर गेले. नवीन पक्षाच्या युवा शाखेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले. नंतर १९८६ पर्यंत ते या पदावर होते. या काळात शरद पवारांमुळं ते १९८२ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे तत्कालीन खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव झाल्यानंतर, कलमाडी यांनी स्थानिक काँग्रेसची सूत्रे हाती घेतली.
कलमाडी यांनी १९९७ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला. त्यावेळी सीताराम केसरी पक्षाचे नेते होते. पुण्यातून तिकीट मिळणार नाही, असं कलमाडींना वाटलं होतं.
१९९९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून त्यांना मिळालेल्या विजयासाठी शरद पवार यांनाही जबाबदार मानलं जाते.
कलमाडी यांचे राजीव गांधींशीही चांगले संबंध होते. दोघांचंही पायलट असणे हे या चांगल्या संबंधाचं एक कारण होतं. पुण्यात त्यांचे अनेक टीकाकार होते, तसे चाहतेही होते. एका ज्येष्ठ पत्रकारांच्या मते, पुण्यात राष्ट्रीय खेळांचे आयोजन झालं तेव्हा शहराचं रूपच बदललं.
“कलमाडींनी पुणे चित्रपट महोत्सव आणि पुणे मॅरेथॉन सुरू केलं. त्यामुळं शहराची प्रतिष्ठा उंचावली. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं नेतृत्व केलं. कलमाडींनी पुण्याचा एकमेव चेहरा म्हणून स्वतःला पुढं करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्ष, त्यांनी शरद पवारांना आव्हान देणारे ते एकमेव नेते आहेत, हे दिल्लीतील पक्ष नेत्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.”
कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप आणि क्लीन चीट
भारतात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून कलमाडींवर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मोठा राजकीय धक्का बसला. २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. क्रीडा स्पर्धांमध्ये भ्रष्टाचार, चोरी आणि कट रचल्याप्रकरणी सुरेश कलमाडी आणि इतर दहा जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
निकालासंबंधीच्या उपकरणांसाठी एका स्विस खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे १४१ कोटी रुपयांच्या फुगवलेल्या किमतीत कंत्राट दिल्यानं सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं होतं असं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं होतं. या प्रकरणात कलमाडी यांना तुरुंगात जावे लागले आणि ९ महिने तुरुंगात घालवल्यानंतर, त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये त्यांना या प्रकरणातून ईडीने क्लीन चीट दिले होते.












