सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.
आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले, पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावाला या बैठीकेमध्ये मंजुरी मिळाली, सुनेत्रा पवार यांची या बैठकीमध्ये गटनेता म्हणून निवड करण्यात आली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या.
१. सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातले तेर.१८ ऑक्टोबर १९६३ रोजी त्यांचा जन्म झाला. बाजीराव पाटील हे त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण होत. छत्रपती संभाजीनगर येथील एस. बी. महाविद्यालय मधून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
२. शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातून सुनेत्रा आणि अजित पवारांचे लग्न ठरले. १९८० मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीला आल्या. प्रारंभी त्या अजित पवारांना त्यांच्या दुधाच्या व्यवसायात मदत करत होत्या.
३. मुंबईत झालेल्या १९८३ च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले. तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले.
४. अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू असलेले गाव दाखवले. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या मूळ सासरी गावी काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात केली.
५. काटेवाडीमध्ये ८० टक्के लोकांकडे शौचालयेही नव्हती. त्यातून आणि निर्मलग्राम आणि ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.
६. राज्यातील ८६ गावांमध्ये निर्मलग्राम मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले. काटेवाडी निर्मलग्राम तर झालेच शिवाय त्याचे इको व्हिलेज म्हणूनही त्यांनी रुपांतर केले. बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ही राबवला.
७. परिसरातल्या स्त्रियांना रोजगार मिळण्यासाठी बारामती मध्ये टेक्सटाईल पार्कला सुरुवात केली. जवळपास १५ हजार महिला या टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात. या टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद २००६ पासून सुनेत्रा पवारांकडे आहे.
८. शरद पवार संस्थापक असलेल्या बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर त्या विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. येथे सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
९. पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी २०१० मध्ये त्यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्ष लावण्याची कामे केली जातात.
१०. दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकासकामांकडे लक्ष देत असले तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी सुनेत्रा पवार निभावत असायच्या. यामुळेच बारामती परिसरात ‘वहिनी’ ही त्यांची ओळख बनली.
११. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून नणंद सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
१२. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्या जागेवर १३ जून २०२४ ला उमेदवारी अर्ज दाखल करत सुनेत्रा पवार खासदार झाल्या.
१३. जैवविविधता संवर्धन, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारण यावर लक्ष केंद्रित करून व्यापक तळागाळातील मोहिमा राबवण्यासाठी त्यांना प्रतिष्ठित ” ग्रीन वॉरियर अवॉर्ड ” ने सन्मानित करण्यात आले.
१४. २०११ पासून त्या जागतिक उद्योजकता मंच (फ्रान्स) च्या थिंक टँक सदस्य आहेत , शाश्वतता आणि सामाजिक नवोपक्रमावरील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये भारताचे त्या प्रतिनिधित्व करतात.
१५. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार व सायबर ग्राम पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
१६. पार्थ आणि जय असे त्यांना दोन मुलगे आहेत. पार्थने २०१९ मध्ये मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. जय हा कुटुंबाचे व्यवसाय पाहतो.












