बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले, ज्यात एनडीएने मोठा विजय मिळवला आहे, तर महागठबंधनला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारांचे आभार मानले, ज्यांनी महागठबंधनवर विश्वास दाखवला. मात्र, निवडणुकीच्या निकालावर त्यांनी मोठे विधान केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, “मी बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. आम्ही अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती.हा लढा संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक प्रभावी करेल.”
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी बिहारच्या जनतेचा निर्णय मान्य करत लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. “आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो आणि संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाही कमकुवत करू पाहणाऱ्या शक्तींविरुद्ध आमची लढाई सुरूच ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर सविस्तर भूमिका मांडू.”
खरगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हताश न होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “बिहारमध्ये महागठबंधनला साथ देणाऱ्या मतदारांचे आम्ही ऋणी आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की, तुम्ही निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमची शान आहात आणि तुमची कठोर मेहनत आमची ताकद आहे. आम्ही जनतेला जागरूक करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. जनतेत राहून संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा हा संघर्ष आम्ही सुरूच ठेवू. हा संघर्ष मोठा आहे आणि आम्ही तो पूर्ण निष्ठा, धैर्य आणि सत्यतेने लढू.”
दरम्यान, आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, पक्ष शनिवारी बैठक घेऊन निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेईल. काय चूक झाली, आमच्या त्रुटी काय राहिल्या, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
