पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या कर केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. काल रात्रीपासून नरसापूर येथील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना फोन करुन या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
काल रात्री या लहान मुलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर नेऊन स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. पुण्याचे एसपी संदीप सिंग गिल यांनी या सगळ्यांची समजूत काढून आंदोलकांना माघारी पाठवले होते. मात्र, शनिवार सकाळी नसरापूरमधील सुपर बाजार चौकात ग्रामस्थांनी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार येत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करत नाही, अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतली. यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे सध्या नरसापूर परिसरात वातावरण तापले आहे. स्थानिक आमदार शंकर मांडेकर हेदेखील आंदोलनस्थळी पोहोचले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशीही फोनवरुन चर्चा केल्याचे समजते.
पुणे जिल्ह्यातील घटना ही अत्यंत निंदनीय, दु:खद घटना आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला आणि तिचा खून केला. आरोपीला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. एकूणच या घटनेमुळे समाजात मोठा रोष आहे. सगळ्यांनाच मुलीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक झाली आहे. पण मी आश्वस्त करु इच्छितो की, फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही हे प्रकरण नेऊ. आम्ही हायकोर्टाला विनंती करु, विशेष सरकारी वकील देऊन या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. मला वाटतं हा असंवेदनशीलपणा आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणं, यापेक्षा दुसरं काही वाईट असू शकत नाही. काही गोष्टींबाबत संवेदना बाळगली पाहिजे. राज्य सरकार जे करायला पाहिजे, ते करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले.













Leave a Reply