पहलगाम हल्ल्याचा बदला अखेर भारतानं घेतलाय. पहलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्यानं सोमवारी केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली. सोमवारी जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंधूर’ रावबत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी ठिकाणं उडवली होती. यात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी ठार केले होते. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य दहशतवादी मोकाट असल्यानं संताप व्यक्त करण्यात येत होते. तशी टीकाही विरोधकांनी सरकारवर केली होती. अखेर सोमवारी (28 जुलै) भारतीय सैन्यानं या हल्ल्यातील तीन मुख्य दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.
ऑपरेशन महादेव कसं राबवलं?
२३ एप्रिलला आम्ही एक बैठक घेतली. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ यांची ही संयुक्त बैठक होती. त्यात आम्ही पहिला निर्णय केला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ दिलं जाणार नाही आणि आपण कुणालाही पळून जाऊ दिलं नाही त्यांना ठार केलं. २२ मे रोजी IB ला एक महत्त्वाची माहिती मिळाली. एका गावात दहशतवादी उपस्थित असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर २२ मे ते २२ जुलै या दहशतवाद्यांचे सिग्नल आपण तपासले. २२ जुलैला आपल्याला मोठं यश मिळालं कारण सेन्सॉरच्या माध्यमातून हे दहशतवादीच असल्याचं समजलं. त्यानंतर चार पॅराचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरु केली. तीन दहशतवाद्यांचा सोमवारी आपण खात्मा केला. दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली. कारण एनआयएने या दहशतवाद्यांना जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं होतं. चार जणांनी ओळख पटवली की ज्या तिघांचा खात्मा केला तेच दहशतवादी होते ज्यांनी पहलगाम ह
ल्ला केला असंही अमित शाह म्हणाले.














