kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

विधानपरिषद निवडणूक अखेर बिनविरोध; नऊ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले अर्ज

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही का? की भाजपाकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाणार, याबाबतचे सर्व तर्क-वितर्क अखेर आज संपुष्टात आले. शिवसेनेचा दहावा चेहरा किंवा मतांचा ‘घोडेबाजार’ या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीकडून आठ आणि महाविकास आघाडीकडून एक असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरले. अतिरिक्त उमेदवारी न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपनानं आपली पाच उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वीच जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असताना, दुपारी एकच्या सुमारास नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी नीलम गोऱ्हे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा टाळतच हालचाली सुरू ठेवण्यात आल्या होत्या. अखेर झिशान सिद्दीकी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुनेत्रा पवारांसह पक्षाचे वरिष्ठ नेते विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रहार संघटना स्वतंत्र राहील, पण, शिवसेनेशी संलग्न राहून रस्त्यावरची ताकद आणि सत्तेची ताकद एकत्र येईल. बच्चू कडू यांचाही हा निर्णय केवळ उमेदवारीसाठी नसून विचारांच्या एकतेसाठी असल्यानं स्वागतार्ह आहे. नीलम गोऱ्हे यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि विधानपरिषदेत महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचा आम्ही आदर करतो. त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.”

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते नाराज होते. त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते काँग्रेस कार्यालयात पोहोचले. त्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचा विरोध मावळला. दुपारी अडीच वाजता अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह अर्ज दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *