kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आशियामध्ये आलेल्या पुरामुळे 600 हून अधिक जणांचा मृत्यू; इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत शेकडो बेपत्ता

आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मुसळधार पावसामुळे आणि दुर्मिळ उष्णकटिबंधीय वादळांमुळे प्रचंड आपत्तीग्रस्त परिस्थिती ओढावली आहे.

आशियातील प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि श्रीलंकेमध्ये भीषण पूर आणि भूस्खलनामुळं अक्षरश: हाहाकार निर्माण झाला आहे.या परिस्थितीमुळे, आशिया खंडातील सुमारे 600 हून लोकांचा मृत्यू झाला आहे.यामुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत, त्यांची घरं वाहून गेली आहेत आणि हजारो लोक बेपत्ता झालेले आहेत.या पूरपरिस्थीमुळे इंडोनेशियामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं आहे. विशेषतः सुमात्रामध्ये हे नुकसान सर्वाधिक दिसून येतं. तिथे वेगाने वाढणाऱ्या पाण्यामुळे काही सेकंदातच घरं उद्ध्वस्त झालेली आहेत.अनेक लोक अजूनही बेपत्ता असून खराब हवामानामुळे बचाव कार्य करणं कठीण झालेलं आहे.दुसऱ्या बाजूला, श्रीलंकेमध्ये दितवा या चक्रीवादळामुळे 159 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत तसेच अनेक लोक बेपत्ता आहेत.प्रभावित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करूनही, शेकडो लोक अडकले आहेत तर हजारो इमारती पाण्याखाली आहेत.

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू, 200 बेपत्ता

भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये दितवा चक्रीवादळामुळे हाहाकार झाला आहे.या चक्रीवादळामुळे श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि मलेशियामध्ये लाखो लोकांना फटका बसला आहे.श्रीलंकेत चक्रीवादळामुळे होत असलेल्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 159 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 जण बेपत्ता झाले आहेत.अलीकडच्या काळात श्रीलंकेत झालेलं हे सर्वात भीषण नैसर्गिक संकट असल्याचं म्हटलं जातं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती उद्भवली आहे.आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या वृत्तानुसार, 20 हजारहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे 1 लाख 8 हजार लोकांना सरकारी तात्पुरत्या निवार्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे प्रांतांना जोडणारे मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. रेल्वेनं शुक्रवारी (28 नोव्हेंबर) सकाळी सहा वाजेपर्यंत काही अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ट्रेन रद्द केल्या आहेत.

श्रीलंकेतील नद्यांची पातळी सातत्यानं वाढते आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं सखल भागात राहणाऱ्या लोकांना इशारा दिला आहे की त्यांनी उंच ठिकाणी जावं.

श्रीलंकेच्या सिंचन विभागाचं म्हणणं आहे की केलानी नदीच्या जवळपासच्या सखल भागांसाठी पुढील 48 तासांसाठी पुराची रेड लेव्हल वॉर्निंगदेखील देण्यात आली आहे.धोका असलेल्या भागांमध्ये कोलंबोचाही समावेश आहे.श्रीलंकेत पुरात अडकलेल्या लोकांची मदत करण्यासाठी सैन्य तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरच्या वापरालाही परवानगी देण्यात आली आहे.परिस्थिती लक्षात घेऊन ॲडव्हान्स लेव्हल एक्झाम (ए लेव्हल परीक्षा) देखील पुढे ढकलण्यात आली आहे.यापूर्वी श्रीलंकेत सर्वात भयंकर पूर जून 2003 मध्ये आला होता. या पुरामुळे 254 जणांचा मृत्यू झाला होता आणि हजारो घरं उदध्वस्त झाली होती.

भारताकडून मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेतील भीषण पुरामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत पाठवली आहे.

पंतप्रधानांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे, “सर्व प्रभावित कुटुंबांची सुरक्षा, त्यांच्याबद्दल संवेदना आणि ते लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करतो.”

त्यांनी लिहिलं आहे, “आपल्या शेजारी देशाशी एकजुटीची भावना राखत, भारतानं ऑपरेशन सागर बंधूअंतर्गत तात्काळ मदत साहित्य आणि आवश्यक मानवीय मदत श्रीलंकेला पाठवली आहे. परिस्थितीनुसार, आम्ही आणखी मदत पाठवण्यास तयार आहोत.”

मोदींनी लिहिलं आहे की “भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरण आणि व्हिजन ‘महासागर’ अंतर्गत, या संकटाच्या परिस्थितीत भारत श्रीलंकेच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे.”

श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू सुरू केलं आहे. याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “ऑपरेशन सागर बंधू सुरू झालं आहे. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरीतून कोलंबोमध्ये मदत साहित्य पोहोचवण्यात आलं. पुढील कारवाई सुरू आहे.”

श्रीलंकेत दितवा चक्रीवादळाचा कहर

किमान 90 जणांचा मृत्यू, 100 जण बेपत्ता

अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ट्रेन रद्द

परिस्थिती पाहून सैन्य तैनात करण्यात आलं

बचाव कार्यात हेलिकॉप्टरचा वापर

कोलंबोदेखील धोक्याच्या सावटाखाली