बांगलादेशामध्ये होत असलेला हिंसाचार आणि हिंदू नागरिकाचे मॉब लिचिंग केल्यानंतर भारतानं प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांची सततची होणारी छळवणूक हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचं भारतानं शुक्रवारी म्हटलं आहे. बांगलादेशामधील आगामी संसदीय निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक झाल्या पाहिजेत, यावरही भारतानं जोर दिला.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हे १७ वर्षानंतर बांगलादेशमध्ये परतले आहेत. याकडं सर्वसमावेशक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या संदर्भात पाहिलं पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले,” बांगलादेशातील मैमनसिंग येथे हिंदू युवक दीपू चंद्र दास यांच्या झालेल्या हत्येचा भारत निषेध करत आहे. हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध यांच्यासह बांगलादेशातील अल्पसंख्याकांची छळवणूक हा गंभीर चिंतेचा विषय आहे. अलीकडील काळात बांगलादेशातील हिंदू युवकाच्या हत्येचा निषेध करतो. या गुन्ह्यातील दोषींना शिक्षा देईल, अशी अपेक्षा करतो,” असे परराष्ट्र मंत्रालयानं साप्ताहिक पत्रकार परिषदेत म्हटलं.
बांगलादेशातील घडामोडींवर भारताचं बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “काळजीवाहू सरकारच्या कार्यकाळात बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या २,९०० हून अधिक घटनांची विविध स्त्रोतांनी नोंद केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटनांना माध्यमांची अतिशयोक्ती म्हणून दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. राजकीय हिंसाचार म्हणून फेटाळले जाऊ शकत नाही. “
बांगलादेशमध्ये दोन हिंदुची हत्या:
‘द डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की, बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात गुरुवारी मंडल नावाच्या २९ वर्षीय हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली. मयमनसिंगमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दासची हत्या झाल्यानंतर काही दिवसांनी हत्या घडली. पांगशा मॉडेल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शेख मोइनुल इस्लाम यांच्या माहितीनुसार मंडलवर स्थानिक रहिवाशांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला. त्यानंतर परिस्थिती चिघळल्यानंतर जमावानं केलेल्या हिंसेत रूपांतरित झाली. यापूर्वी, गारमेंट कारखान्यात काम करणाऱ्या दीपू चंद्र दासला जमावानं मारहाण करून ठार केले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाळण्यात आला होता. सुरुवातीला धर्मनिंदेमुळे दासची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, कामाच्या ठिकाणावरील वादावरून हत्या केल्याचं समोर आलं होतं. यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयानं दासच्या हत्येबद्दल माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही घटना भयंकर असून न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले होते.














