kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘राऊतांनी आता पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं,’ नरकातला स्वर्ग पुस्तकावरुन गोऱ्हेंचा शाब्दिक चिमटा

नीलम गोऱ्हे यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरुन राऊतांना चिमटा काढला आहे. ‘संजय राऊत हे कशासाठी जेलमध्ये गेले होते. त्यांनी काय सत्याग्रह केला का त्यांनी काय आंदोलन केलं होतं का? पत्राचाळीमध्ये गरिबांच्या घरांमध्ये व त्यांच्या पैशांमध्ये अफरातफरी केली होती. मनी लॉन्ड्रींग केली होती. म्हणून संजय राऊत हे नरकातल्या स्वर्गात गेले होते. त्याचबरोबर संजय राऊत यांनी साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. स्वप्ना पाटकर या साक्षीदारांना त्यांनी महिला असून देखील त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. स्वप्ना पाटकर यांना संजय राऊत यांनी शिव्या दिल्या. स्वप्न पाटकर यांनी जर तक्रार दिली नसती तर संजय राऊत यांना पुस्तक लिहायला मिळाले नसते, असे म्हणत या पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकर यांना द्यायला हवे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

परभणीत आज शिवसेनेच्या वतीने महिला मेळावा संपन्न झाला. मेळाव्यानंतर नीलम गोऱ्हेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत हे आपण सर्वश्रेष्ठ नेते आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते ज्यांच्यावर आरोप करत आहेत, ते मोदी साहेब शहा साहेब किंवा शिंदे साहेब हे स्वतः समोर आहेत, ते स्वतः बोलू शकतात. संजय राऊत हे एका पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर आहेत आणि ते त्या पदाचा या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी पुरेपूर वापर करून घेत आहेत. टीआरपीच्या खेळामध्ये आपण कसे पुढे आहोत, हेच दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हेंनी पुढे लाडक्या बहि‍णींच्या पैशांच्या वापरावरही भाष्य केले. ‘परभणी येथे आयोजित महिला मेळाव्यात काही महिलांनी मला सांगितले की, लाडक्या बहिणीचे पैसे आल्यानंतर नवरा पैसे हिसकावून घेतो आणि दारू पितो, अशा घटना घडत असतील तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. आम्ही त्यांच्यात हस्तक्षेप करू. लाडक्या बहिणीचे पैसे दारू पिण्यासाठी कदापी घेऊ नये. समाजाने देखील यामध्ये हस्तक्षेप करावा आणि अशा प्रवृत्ती टाळाव्यात,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, काही महिलांनी लाडक्या बहिणीचे पैसे आल्यानंतर आम्ही स्वतःसाठी साडी घेतली, मुलांचा दवाखाना केला, घरात संसारोपयोगी वस्तू घेतल्या, असे देखील म्हणाल्या. आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना त्यांच्या मानधनावर कर्ज देखील देणार आहे. माझे महिलांना आवाहन आहे की, गरज असेल तरच कर्ज घ्या. अन्यथा लाडक्या बहिणीचे पैसे जमा करून बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करा आणि काम पडल्यास ते खर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी ही योजना काढून महिलांचे कल्याण केले आहे. सरकार योग्यवेळी १५०० रुपयांवरून २१०० रुपये लाडक्या बहिणींचे अनुदान वाढवेल. विरोधी पक्ष सरकारची बदनामी करत आहेत की, लाडक्या बहिणीचे पैसे कमी केले. पण लाडक्या बहिणींना मुळात अनुदान हे या सरकारने सुरू केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.