kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

वाचा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मनसेच्या स्थापनादिनानिमित्त गुढीपाडवा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करुन महानगरपालिका निवडणूक लढवली. त्यानंतरचा हा पहिला मेळावा होता. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. चला बघुयात ते काय काय म्हणाले आहेत.

काय म्हणाले मनसे प्रमुख राज ठाकरे ?

इराण आणि इस्रायल – अमेरिका युद्धावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाष्य करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. राज ठाकरेंनी म्हटलं, गेली अनेक वर्षे इराण आपल्याला साथ देत होता आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती. इराण हा काश्मीरच्या मुद्द्यावर आपल्याला कायम साथ देत होता. या देशात येणारं बरचसं तेल इराणमधून येतं. ते आपल्याला रुपया या चलनात देतात. खामेनींच्या मृत्यूनंतर सुद्धा मोदींनी निषेध व्यक्त केला नाही. निषेधाचा एकही शब्द काढला नाही.

आज संपूर्ण देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं आहे. सर्वांनी इन्स्टाग्राममधून बाहेर या. डान्सबार बंद झाले आणि इन्स्टाग्राम सुरू झाले. सरकारला विरोध करू नये म्हणून सोशल मीडिया डिझाईन केलंय. पूर्वी राग व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर यायचे पण आता लोक मोबाईलवरच राग व्यक्त करतात. माध्यमांवर सतत वरुन दबाव येतो, विरोधात बातम्या चालू देत नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी म्हटलं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर 2 लाख कोटींचं कर्ज होतं. आता महाराष्ट्रावर 11 लाख कोटीं रुपयांचं कर्ज आहे. पिझ्झा मागवल्यावर 10 मिनिटांत येतो पण तुम्हाला 10 मिनिटांत कुठेही पोहोचता येत नाही. ब्रिटिशांच्या काळात हे मैदान उभे राहिले म्हणून हे मैदान आहे. आज असे मैदान कुठे आहे सांगा? आपण मुलांसाठी बागा तयार करतोय का? त्या बागांची अवस्था पाहिल्यावर तिथे जावसं वाटतं का? शहरे अक्षरश: कोलमडून पडली आहेत. मी मध्यंतरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो.

राज ठाकरेंनी म्हटलं, दररोज राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. कुणालाही काहीही पडलेले नाहीये. इथे आपण कोस्टल रोडची स्तुती करतो. मराठी माणसंच याचं कौतुक करतात. छान झालाय हा रस्ता… पण हा रस्ता तुझी वाट लावायला झालाय. हा रस्ता तुमच्यासाठी झालेला नाही तर बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठी बनला आहे. सर्व जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत. शहरात कुणीही कशाही इमारती बांधू देण्यास परवानगी दिली जात आहे. सर्व जमिनी देताना सरकार न बघता सह्या करतंय.

लहान-लहान मुलं-मुली पळवली जात आहेत. नोव्हेंबर – डिसेंबर या 36 दिवसांत केवळ मुंबईत 86 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या काळात महाराष्ट्रात नवी मुंबई शहरात 499 मुलांच्या अपहरणाच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यातील 41 मुलं अद्याप बेपत्ता आहेत. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत म्हणून त्या आई-वडिलांची त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी साधारण साडेचार हजार ते साडेपाच हजार मुलं बेपत्ता होतात. काय वाटत असेल त्या मुलांच्या आई-वडिलांना… असा होता महाराष्ट्र? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

प्रबोधनकार ठाकरे… आमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रुढी परंपरांवर प्रहार करणारा हा माणूस.. त्यांची पुस्तके आजही वाचा तुम्ही… अनेक लोक सांगतात की प्रबोधनकार ठाकरे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधात ते होते. ते कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

2006 मध्ये मी याच व्यासपीठावर म्हटलं होतं, महाराष्ट्राचा विकास आराखडा आणेल. 2006 मध्ये जेव्हा मी म्हटलं होतं महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणेल. 2014 मध्ये मी हा विकास आराखडा आणला. 2006 ते 2014 या काळात महाराष्ट्रात मी जिथे जिथे गेलो तेव्हा सर्वजण मला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारायचे विकास आराखड्याचं काय झालं. जेव्हा ब्ल्यू प्रिंट आणली तेव्हापासून आजपर्यंत एकाही पत्रकाराने मला प्रश्न विचारला नाही की, त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे? कारण वाचलीच नाही… त्यांना वाचण्यात इंट्रेस्ट नव्हता तर हिणवण्यात होता. असो… तो काळ गेला.असे ते म्हणाले.

यावेळी राज ठाकरेंनी एक वेबसाईट लॉन्च करत असल्याचं जाहीर केलं. महाराष्ट्र पुढचा (Maharashtra Next) मी तुमच्यासमोर उभा करत आहे. यामध्ये तुम्हाला दोन पर्याय असतील मराठी आणि इंग्रजी. त्यापैकी एका पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला विविध पर्याय दिसतील. मी तुम्हाला एकूण 27 विषय सांगितले आहेत. त्यावर तुम्हाला कोणतीही नवी कल्पना मांडायची आहे ती तुम्ही मांडू शकता. आम्ही तुमच्या आणि सरकारमधील केवळ वाहक असू… हे सर्व सरकारकडे जाण्यापूर्वी एका तज्ञांच्या समितीकडे जाणार आणि मग हे सरकारपर्यंत आम्ही मांडणार.