भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्षाची मालिका हिंगोलीतही कायम असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी भाजपशी संधान बांधल्यानंतर ’50 खोके एकदम ओके’ या विरोधकांच्या बोचऱ्या आरोपांनी शिंदेसेनाला अक्षरश घायाळ केलं होतं. विरोधकांच्या याच आरोपांना आता हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनीच बळ दिल्याचं दिसतंय. सत्तांतरासाठी कमळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप मुटकुळेंनी केला. यामुळे हिंगोलीतल्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीत वादाची नवी ठिणगी पडली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाल्या आहेत अयोध्या पोळ ?
संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांनी संगनमत करुन एकमेकांवर आरोप/टीका करुन माध्यमांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन केला आहे ज्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत..
एकंदरीत पाहता #हिंगोली सह महाराष्ट्राचे #मनोरंजन उत्तम करत आहेत सत्ताधारी संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे..
स्टंटबाज
स्थानिकस्वराज्यसंस्था
नेमकं काय आहे प्रकरण ?
राज्यामध्ये सत्तांतर होत असताना संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतल्याचा दावा तानाजी मुटकुळे यांनी केला. संतोष बांगर यांच्यावर टीका करताना तानाजी मुटकुळे म्हणाले की, “संतोष बांगर हा हिंगोलीला लागलेला कलंक आहे. हिंगोलीमध्ये कधीही मटक्याचं नाव नव्हतं, वाळू माफिया नव्हते. संतोष बांगर यांनी हिंगोलीत जुराराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू केले, वाळू तस्करी सुरू केली.”
तानाजी मुटकुळे यांना प्रत्युत्तर देताना संतोष बांगर म्हणाले की, “तुमच्यासारखे आम्ही कधी 376 चा गुन्हा बाजूला केला नाही. त्यामध्ये तुम्ही ड्रायव्हरचा बळी दिला. आम्ही नाही तर तुम्हीच हिंगोलीला कलंक आहे.”
तानाजी मुटकुळेंच्या या आरोपानंतर हिंगोलीत महायुतीतला संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संतोष बांगर यांनी भाजपाच्या 2 उमेदवारांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला. त्यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना आता या आरोपांनंतर संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हं आहेत.
संतोष बांगर यांनी त्यांची भावजई रेखा बांगर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून आता प्रचाराला वेग आला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर स्वतः हिंगोली शहरामध्ये घरोघरी जात भाऊजई रेखा बांगर यांचा प्रचार करत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेत घरोघरी जात मतदान करण्याचा आव्हान बांगर यांच्यावतीने केला जात आहे. विजयाचा गुलाल शिवसेनाच उधळेल असा विश्वास सुद्धा यावेळी संतोष बांगर यांनी व्यक्त केला.














