आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या इंजिनाला आपल्या वेगवेगळ्या अनेक घटकपक्षांचे डब्बे लागले आहेत. अशा डब्यांमध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, सगळ्यांना बसण्याची जागा आहे. ही विकासाची गाडी आहे. त्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जाते आहे असे स्पष्ट करतानाच तुम्ही सुनिल तटकरेंच्या घड्याळाचे बटन दाबताक्षणी रायगडची बोगीदेखील आमच्या मोदीसाहेबांसोबत लागते आणि रायगडच्या जनतेला विकासाकडे घेऊन जाते असे उद्गार भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथील विराट सभेत काढले.

ही निवडणूक ग्रामपंचायतींची…जिल्हा परिषदेची… ही निवडणूक नगरपंचायतीची…महानगरपालिकेची… विधानसभेची नाही… तर देशाच्या लोकसभेची आहे… देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे… कोणाच्या हातात देश सुरक्षित राहिल… कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल… कोण आमच्या येत्या पिढ्यांचे भाग्य आणि भवितव्य बदलू शकेल याचा फैसला करणारी निवडणूक आहे… आणि या निवडणुकीत केवळ दोनच पर्याय आपल्यासमोर दिसत आहेत… पहिला पर्याय आहे विश्वगौरव… विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि मोदींजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी असेल आता मनसेही सोबत आहे. रिपाईसुध्दा आहे, अशी भव्य महायुती आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी आहे. असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दुसरीकडे काय अवस्था आहे. तिथे डब्बेच नाहीत. प्रत्येकजण सांगतोय मीच इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन… पवारसाहेब म्हणतात मी इंजिन उध्दव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे… मात्र आपल्याकडे बसायला ट्रेन आहे आणि बसायला जागाही आहे. परंतु इंजिनमध्ये किती लोकांना बसायला जागा असते. इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो. सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही आणि त्यांचे इंजिन कसे आहे. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना जागा आहे तर शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेच बसू शकतात आणि उध्दव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात. इतर कुणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसायची जागा नाही… यांचे इंजिन कसे आहे तर राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात… शरद पवार बारामतीकडे ओढतात आणि उध्दव ठाकरे मुंबईकडे ओढतात… त्यामुळे यांचे इंजिन जागेवरून हालतही नाही डुलतही नाही फक्त ठप्प पडलेले आहे. त्यामुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचा… ज्यांनी या देशाला विकासाकडे नेले आहे असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या देशात मोदींनी काय किमया केलीय तर दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोकं हे गरीबी रेषेच्यावर आले. दहा वर्षात २० कोटी लोकं जे झोपडीत रहायचे त्यांना पक्के घर मिळाले. देशामध्ये ५० कोटी घरांमध्ये मोदींनी गॅस पोहोचवला. ५५ कोटी लोकांना शौचालयाची व्यवस्था केली. ६० कोटी लोकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचवले. ५५ कोटी लोकांना ५ लाखांपर्यंत उपचार आयुष्यमान भारत माध्यमातून मोफत दिला. ६० कोटी तरुणांना मुद्राचे दहा लाखापर्यंत कर्ज विनातारण दिले. यात ३१ कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. ८० लाख बचत गटांना ८ लाख कोटी रुपये दिले आणि महिलांना स्वतः च्या पायावर उभे केले. मोदी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष उभा रहातो पण महिला पायावर उभ्या राहिल्या तर संपूर्ण कुटुंब पायावर उभे राहते. आता बचतगटांच्या महिलांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, सरकारी जागा परिसरात विक्री केंद्र उभी करायला सांगितले आहे आणि आता २०२६ नंतर विधानसभेतही आणि लोकसभेतही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे महिलांना अधिकार देण्याचे काम मोदींनी केले आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणण्यात आल्या आहेत. सगळे प्रश्न सोडवत आहोत काळजी करू नका. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा झाले तर अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणली जाणार आहे. देशात आणि राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहेत. मोदींनी या देशातील भ्रष्टाचार संपवला आणि जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवला आहे. कोरोना काळात या देशातील जनतेला लस तयार करून जिवंत ठेवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अनंत गीते आमची मते घेऊन निवडून येत होते त्यावेळी त्यांना गुदगुल्या होत होत्या आणि आज आमच्यावर टिका करत आहेत. पण लक्षात ठेवा अनंत गीते याठिकाणी खरी शिवसेना आमच्यासोबत… हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला त्यांच्यासोबत जनता कधीही जाणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

अख्खा पेण सुनिल तटकरे यांच्या पाठीशी असेल. तटकरेंना चिंता करण्याचे कारण नाही. पुढील पाच वर्षे मोदींच्या हाती सत्ता देणार आहोत. त्यामुळे सुनिल तटकरे यांची निशाणी घड्याळ सून त्यावरील बटन दाबणार तेव्हा ते थेट मत मोदींना मिळणार आहे असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

परराष्ट्र धोरण, परराष्ट्र नीती व्यवस्थितपणे नरेंद्र मोदी हाताळत आहेत. खंडप्राय देशात ठळकपणे सर्वसामान्य योजना नियोजन पध्दतीने राबवल्या जात आहेत. अटलसेतूमुळे कोकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोस्टल हायवेचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. ७०० कोटी रुपये नितीन गडकरी यांनी हायवेसाठी दिले आहेत. २०२४ पर्यंत ४जी आणि ५जी नेटवर्क पूर्ण केले जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर सभेत दिले.

पेणच्या ऐतिहासिक नगरीतील गणरायाच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करतानाच ४०० पार आकडा गाठला जाईल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

अनंत गीते भाजपचे कव्हर होते म्हणून तुम्ही निवडणूक लढलात. सलग दोनवेळा मंत्री असूनही एका फुटक्या कवडीचे काम मतदारसंघात करता आले नाही असा जोरदार टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

मुंबई मनपा जशी उबाठाचा आत्मा आहे तशी रायगडची जिल्हा परिषद शेकापचा आत्मा आहे. त्यामुळे रायगड आणि मुंबईतील आगामी निवडणुकीत महायुतीचे एकत्रित झेंडा फडकवुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

आलेला हा जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा ठरवणार आहे. उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरवले जाणार आहे. त्यामुळे राज्यात ४५+ जागा येतील त्यात रायगडचा मोठा सहभाग असेल असा दावा सुनिल तटकरे यांनी केला.

या निवडणूकीने वेगळा बेंचमार्क ठरणार आहे. आपली लढाई ही बुथवर लढायची आहे. ७० टक्के मतदान सुनिल तटकरे यांना कसे होईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुनिल तटकरे यांचा ऐतिहासिक विजय विक्रमी मताधिक्याने करायचा आहे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

काल काही जाहिरनामे प्रसिद्ध झाले आहेत. कितीही जाहिरनामे प्रसिद्ध झाले तरी ४ जूननंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत ही काळया दगडावरची रेघ आहे असा विश्वास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

ही निवडणूक लोकसभेची आहे परंतु काहीजण ग्रामपंचायत निवडणुकीसारखे लढत आहेत. विरोधकांनी रचलेला डाव ओळखण्याची आज गरज आहे असे सांगतानाच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली उबाठा चालत आहे असा थेट हल्लाबोलही उदय सामंत यांनी केला.

सुनिल तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणारच शिवाय रत्नागिरी जिल्ह्यातूनही मताधिक्य देण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले.

महायुतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पेण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आज पार पडली.

या महायुतीच्या जाहीर सभेला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे,रायगडचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.