राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे. येत्या 4 तारखेचं मोदीजींना आजच आमंत्रण देतोय. मोदीजी, तुम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं आमंत्रण देतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बोलवायचं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी डिवचलं. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. दादर येथे संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

मी काहीही बोललो तरी शब्दांचा चुकीचा अर्थ काढतात. काल फडणवीस म्हणाले मी हिॅदू शब्द सोडला. मी भाजपला लाथ घातली. पण हिॅदूत्त्व नाही सोडलं. आम्ही मोदीभक्त नाही, देशभक्त आहोत. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. आता मोदी संघाला नकली संघ म्हणतील तो दिवसही दूर नाही. जेपी नड्डा यांनी तर आम्ही स्वयंपूर्ण झालोय. संघाची गरज नाही, असं म्हटलंय. 2025 मध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संघासाठी 100 वरीस धोक्याचं आहे. कारण संघ नसणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आम्ही कुणातही विलीन होणार नाही. 4 जूननंतर भाजपची हालत काय होणार? हे निवडणूक लढायला निघाले आहेत. यांच्या नावावर मैदान बुक होत नाही. भाडोत्री लोकांकडून मैदान घेतलं. भाडोत्री वक्ते आणले. सगळा कारभार दुसऱ्यांच्या भरवश्यावर आहे, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

भाजपने या दहा वर्षात मुंबईचे उद्योग, हिरेबाजार आणि इतर उद्योग गुजरातला नेले. सगळं गुजरातच्या घशात घातलं. तुम्ही मुंबईला भिकारी करत आहात, असा हल्ला त्यांनी चढवला. मनपाची परवानगी नसताना होर्डिंग्ज उभारली. घटनेनंतर दोन दिवसांनी मोदींनी रोड शो केला. रोड शोसाठी मुंबई मनपाचे 5 ते 10 कोटी रुपये खर्च झाले, असं ते म्हणाले.

भाजपमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. इतर उमेदवार पळवावे लागत आहेत. गोंधळ घालण्यासाठीच आपली निशाणी चोराच्या हाती दिली. काही ठिकाणी नोटा वाटल्या जात आहेत. काही ठिकाणी तर खोट्या नोटा वाटल्या जात आहे. आपल्याला आता सुपारीबाज नको. धोकेबाज नको. कट्टर शिवसैनिक हवा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.