जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. अवघ्या देशाचं लक्ष आज लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे. देशात महायुतीचं सरकार की इंडिया आघाडीचं? महाराष्ट्रात काय चित्र असणार? महायुती जिंकणार की महाविकास आघाडी? याची सर्वांमध्येच उत्सुकता आहे. महाराष्ट्रात काय होणार, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.

एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या मतमोजणी केंद्रावर मतमाेजणी सुरू आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर रिंगणात उभे आहेत. यंदाची लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याची शक्यता निकालाच्या आधीपासूनच वर्तविण्यात येत हाेती. मात्र भाजपाने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.

नागपूर मतदारसंघाच्या पोस्टल बॅलेट मोजणीत भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत , उत्तर मध्य मुंबईत टपाली मतदानामध्ये वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत , सांगली लोकसभा पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील सहा विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.

‘बारामती’त सुनेत्रा पवारांनी घेतली आघाडी, सुप्रिया सुळे पिछाडीवर आहेत, कोल्हापुर मतदार संघातून पोस्टल मतदानात शाहू छत्रपती आघाडीवर तर हातकणंगले मतदारसंघ पोस्टल मतदानात सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर आहेत. अमरावतीमध्ये नवनीत राणा तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर आहेत .

तब्बल एक महिना आणि ९ दिवसानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता वर्धा लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम ईटीपीएस व पोस्टल बॅलेट दहा आणण्यात आले. प्रत्यक्ष टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. केंद्रामध्ये आयोगाचे दोन ऑब्झर्वर उपस्थित आहेत. परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोकसभेसाठी २६ एप्रिल रोजी उच्चांकी ६४.८५ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत राजकीय पक्षांचे १३ व अपक्ष ११ असे २४ उमेदवार रिंगणात आहे.