विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे. मुंबईतील अनेक जागांवर प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केला असून काही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आग्रह धरला आहे. त्यामुळे काही जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे.

मुंबईतील ३६ जागांपैकी काही जागांवर आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांनी दावा केला आहे. असे असताना मुंबईतील मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या पाच जागांवर मात्र आघाडीतील कोणत्याही पक्षांनी अद्याप दावा केलेला नसल्याचे समजते. या पाचही जागांवर भाजपचे आमदार असून, पराभवाच्या भीतीनेच अद्याप या जागांवर दावा करण्यात आला नसल्याचे समजते.

एकीकडे काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला असताना, मुंबईतील पाच जागांवर मात्र आघाडीमधील अद्याप एकाही पक्षाने दावा केला नसल्याचे समजते. यामध्ये मुंबईतील मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या पाच जागांचा समावेश आहे. या पाचही मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. या जागांवर निवडणूक लढवली तर आपला पराभव होईल अशी भीती महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना असल्याने समजते. त्यामुळे या जागा आपल्याकडे येण्यापेक्षा आपल्या मित्रपक्षांकडे जाव्यात यासाठीच अद्याप या जागांवर कोणी दावा केला नसल्याचे समजते.