मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतील, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. तर मनोज जरांगे पाटील परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असंही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणावर आहे, आता हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज ठाकरे हे आज ठाण्यात पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी राज ठाकरे यांना माध्यम प्रतिनिधींनी घेरल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांनी राज ठाकरेंना मराठा समाजाचं आझाद मैदानावरील आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेसंदर्भात सवाल केला. यावर राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील.. तर मुंबईकरांना मराठा आंदोलकांमुळे त्रास होतोय. यावर सवाल केला असता ते म्हणाले, मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना, मग हे परत का आले? असा सवालही त्यांनी केला.









