राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे ते विमानातून प्रवास करत होते. यावेळी तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी विमान थेट जमिनीवर कोसळले आणि यातच अजित पवार यांचा मृत्यू झाला. यावेळी अजितदादांसोबत असणारे त्यांचे सुरक्षा रक्षक, क्रू मेंबर आणि पायलट यांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, विमान जमिनीवर आदळल्यानंतर क्षणात मोठा स्फोट झाला. दरम्यान, अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील दु:ख व्यक्त केले असून अजित पवार यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थनादेखील त्यांनी केली आहे.
अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले?
‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांचा पक्ष किंवा राजकारणानिमित्त आमची कधीही भेट झाली नाही. परंतु एक व्यक्ती समाज आणि देशासाठी किती काम करू शकते, हे त्यांच्याकडे पाहून समजून यायचे. मी एवढेच म्हणेन की ही फार दुख:द घटना घडलेली आहे. परंतु त्यांच्या आत्म्याला चीरशांती मिळावी हीच देवाकडे प्रार्थना करतो,’ अशा भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या.















