kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सूचना

मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए.,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे रूपांतर आदर्श शासकीय संस्थेमध्ये करावे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.महाविद्यालयाच्या आधीच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा समावेश करून नवीन मास्टर प्लॅन तयार करावा. नवीन रुग्णालयात आधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी सेवा यांचा समावेश असावा, उत्कृष्ट सुविधा असाव्यात. मराठवाड्यासाठी हे महाविद्यालय महत्वाचे असून येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा. काम लवकरात लवकर पूर्ण करावे, सध्या अस्तित्वातील इमारतींचा नियोजनपूर्वक वापर करावा, अशा सूचना दिल्या.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यवाही वेगाने करावी. चांगला आराखडा तयार करून, कार्यवाही ठोस पद्धतीने व्हावी असे स्पष्ट केले. मराठवाडा विभागातील लोकसंख्येसाठी ही सुविधा म्हणजे एक मोठा दिलासा ठरणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन संधी मिळणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ सेवांचा लाभ मिळेल असेही हसन मुश्रीफ म्हणाले.