शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा रोहित पवारांनी घेतला आहे. या आंदोलनास्थळी अनेक शेतकरी देखील उपस्थित आहेत. तसेच रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारही आंदोलनास्थळी उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. रोहित पवारांनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय किंवा अन्नत्याग केलेला आहे, तर त्यासाठी एक पाठिंबा म्हणून मी इथे बसलेलो आहे. बरेच पत्रकार मला विचारतात की बाप म्हणून काय वाटतं? हा तुमचा कॉमन (नेहमीचा) प्रश्न आहे. माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो, तरी मी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे, असं राजेंद्र पवार म्हणाले. कर्जाच्याबाबतीत जर म्हणालात, तर माझं काय आणि त्याचं काय काही केलं तरी कर्ज माफ होणार नाही. रोहित जो बसलाय, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आता यासाठी शेतकऱ्यांनी घरात बसायचं कि इथे येऊन आंदोलनात सहभागी व्हायचं? हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवावं, असंही राजेंद्र पवारांनी सांगितलं.
सगळा सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी इथपर्यंत पोहोचतो असं नाहीये, पण त्यांनी त्यांच्या गावात करावं, त्याच्या तालुक्यात करावं. ज्याला जसं जमतं तसं त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. आणि जर शेतकरी काय आणि कोणीही जर व्यक्त नाही झालं, तर या सरकारला जाग कधीच येणार नाही. आणि सरकार… एक नागरिक म्हणून मी बोलतोय की, सरकार हे त्यांच्या धुंदीत धुंद आहे, असा हल्लाबोलही राजेंद्र पवारांनी केला.
…तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार नाही – रोहित पवार
सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या GR मध्ये 2019 चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजारापर्यंत लाभ देण्याची अट आणि प्रोत्साहन अनुदान देताना 2025-26 आणि 2026-27 चं पीक कर्ज भरणं अनिवार्य केल्याची अट आहे. या दोनच अटींमुळं सुमारे 37 लाखाहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळं या दोन जाचक अटी आधी काढा, एवढीच आमची साधी सरळ मागणी आहे. तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार नाही, असं रोहित पवार म्हणाले.













Leave a Reply