kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार

अभिनेता व तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील सभेत शनिवारी चेंगराचेंगरी होऊन किमान ३६ लोकांचा मृत्यू झाला तर ४५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ८ लहान मुले आणि १६ महिलांचा समावेश आहे. सभा सुरू असताना, अनेक लोक अचानक बेशुद्ध पडले. या प्रकरणी आता केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला.

तामिळनाडू सरकारला लिहिलेल्या पत्रात गृहमंत्रालयाने चेंगराचेंगरी आणि पीडितांना वाचवण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती मागितली आहे. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. चेंगराचेंगरीबाबत अभिनेता विजय यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याशी फोनवरून बोलून करूर येथील चेंगराचेंगरीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी केंद्रीय मदतीचे आश्वासन दिले.

गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर केलेल् पोस्टमध्ये म्हटले आहे की, “करूर येथील चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो आणि जखमींना लवकर बरे होण्याची इच्छा आहे.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “तामिळनाडूतील रॅलीमध्ये झालेल्या दुःखद अपघाताने मला खूप दुःख झाले आहे. निष्पाप जीवांचे नुकसान खरोखरच हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांना माझ्या मनापासून संवेदना. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो.”

राहुल गांधी यांनीही दुःख व्यक्त केले

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही चेंगराचेंगरीतील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. राहुल गांधी म्हणाले, “या दुर्दैवी घटनेने मला खूप दुःख झाले आहे, अनेक मौल्यवान जीव गमावले. माझ्या संवेदना त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत आणि जखमी झालेल्या सर्वांच्या लवकर पुनर्प्राप्तीची मी प्रार्थना करतो.”