kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पाकिस्तानमध्ये सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. बलुच बंडखोर आणि सैन्यात सुरु असलेल्या तुफान चकमकीत आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 145 बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) सैनिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 31 नागरिकांचा समावेश आहे. गेल्या 40 तासांपासून ही चकमक सुरू आहे. या कारवाईतील मृतांचा आकडा हा पाकच्या लष्करी कारवाईच्या इतिहासातील सर्वाधिक आकडा आहे अशा माहिती मुख्यमंत्री सरफराज बुगटी यांनी केली आहे.

बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाने ऑपरेशन हारोफ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यामुळे बलुचिस्तान प्रांतात परिस्थिती बिकट झाली आहे. दहशतवाद आणि हिंसाचारामुळे संपूर्ण बलुचिस्तान प्रांताचे छावणीत रूपांतर झाले आहे. सुरक्षा दलांनी अनेक भाग सील केले आहेत. या भागातील इंटरनेट सेवा 24 तासांपासून बंद आहे. या स्फोटांनंतर क्वेटासारख्या प्रमुख शहरांमधील बाजारपेठा ओसाड पडल्या आहेत. ट्रेनपासून आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगामी काळात या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी म्हटले की, “आमच्या सैनिकांनी नोश्की येथील दहशतवाद विरोधी विभागाचे मुख्यालय ताब्यात घेतले असून जिल्हा तुरुंगातून 30 कैद्यांना मुक्त केले आहे. तसेच बंडखोरांनी अनेक पाकिस्तानी सैन्य तुकड्या नष्ट केल्या आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा लुटला. क्वेटा, ग्वादर आणि मुस्तुंग सारख्या भागात या कारवाया झाल्याने पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे.”

पाकिस्तानी लष्कर आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यांसाठी भारताला जबाबदार धरले आहे. या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान स्वतःच्या चुकांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. आमच्यावर आरोप करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या लोकांच्या मागण्या ऐकणे गरजेचे आहे.